रयत सेवकांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे सोबत राहणार – राजेंद्र कोठारी
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीवर निवड; मान्यवरांकडून सत्कार व अभिनंदन
जामखेड प्रतिनिधी :
“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १०५ वर्षांपूर्वी लावलेले रयत शिक्षण संस्थेचे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे. हा वटवृक्ष टिकला तरच महाराष्ट्रातील बहुजन, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या शिक्षणाचा पाया भक्कम राहील. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्था कटिबद्ध असून रयत सेवकांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे सोबत राहणार आहे,” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीचे नवनियुक्त सदस्य राजेंद्र कोठारी यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीवर निवड झाल्याबद्दल राजेंद्र कोठारी यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, दिलीप ढवळे, कुंडल राळेभात, मुख्याध्यापिका आर. आर. भोर, प्रा. लक्ष्मण ढेपे, नगरसेवक राजेंद्र गोरे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, पत्रकार अविनाश बोधले, शिवाजी इकडे, नासीर चाचू, बाबासाहेब मगर, बिभीषण परकड, प्रकाश काळे, प्रा. राहुल आहिरे, दादा महाडिक, अमोल लोहकरे, सचिन शिंदे, बजरंग डुचे, मोहन यादव, चंद्रकांत डुचे, प्रा. फुंदे, मयूर भोसले, संदीप टेकाळे, अमोल भोंडवे यांच्यासह आजी-माजी रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रा. लक्ष्मण ढेपे, मुख्याध्यापिका आर. आर. भोर, कुंडल राळेभात, प्रकाश काळे, सुदाम वराट आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत राजेंद्र कोठारी यांना शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढाळे यांनी कोठारी यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागमय कार्याची आणि रयत शिक्षण संस्थेच्या विकासाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

सत्काराला उत्तर देताना राजेंद्र कोठारी म्हणाले, “स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण हे केवळ मोजक्या लोकांपुरते मर्यादित होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘मागितलेली दान, मिळवलेले ज्ञान’ या तत्त्वावर शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली. शेतकरी, कामगार, दलित आणि वंचित घटकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

आज रयत शिक्षण संस्थेच्या ६७५ शाखांमध्ये साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्थेतील सेवकांच्या प्रश्नांबाबतही आम्ही संवेदनशील राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.”
यावेळी त्यांनी जामखेड-कर्जत मतदारसंघाच्या विकासाविषयी बोलताना आमदार रोहित पवार यांच्या विकासकामांचाही उल्लेख केला. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मतदारसंघात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नगरसेवक राजेंद्र गोरे यांनी केले.



