चोंडीत पार पडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा..

जामखेड प्रतिनिधी
वंचित दलित व आदिवासी कातकरी यांना शिक्षण व रोजगारासाठी प्रयत्न करणार्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी वंचितांसाठी राज्य चालवले. आम्हीही तोच आदर्श समोर ठेवून वंचितांसाठी राज्य चालवण्याची प्रतिज्ञा आज घेत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी चौंडी येथे केले.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढच्या वर्षी चौंडी येथे नक्की आणण्याचा शब्द मी देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी येथे येऊन अहिल्यादेवी यांना अभिवादन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, क्रीडामंत्री दत्त मामा भरणे, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे आदींसह अन्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवींच्या राज्यकार्याची माहिती देऊन त्यांचा कारभार आमच्यासाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. कल्याणकारी राज्याच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य व त्यासोबतच छत्रपतींच्या आदर्शावर काम करणारे लोकमाता अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य ही दोन राज्य आमचा आदर्श आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवी यांनी स्वतःची शस्त्रास्त्रे बनवली होती. महिला सैनिकांची तुकडीही त्यांची होती. तोच आदर्श भारत सरकारचा पण आहे. मोदी सरकारने स्वतः बनवलेले ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्र याने नुकत्याच झालेल्या सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानची लष्करी तळे उद्ध्वस्त केली हे आपण पाहिले, असे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले, हुंडा देणे व घेणे हा गुन्हा अहिल्यादेवींनी ठरवला होता व त्यांच्या 28 वर्षाच्या राज्य कारभारात असा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत नव्हती, असे फडणवीस म्हणाले. नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केले आहे. चौंडी येथे 681 कोटींचा विकास आराखडा केला आहे. आदिशक्ती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण योजना राबवली जात आहे. सिनेमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट करणार आहोत असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान चौंडी मराठी संस्कृतीचे जागृत देवस्थान आहे. लोककल्याणकारी राज्य, सुराज्य जगाला दाखविण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. अहिल्यादेवींनी सर्वसामान्य माणसांच्या विकासाचे काम केले. त्यांनी धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. महिलांसाठी सैनिक तुकडी सुरू करण्याची त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली आहे.

अहिल्यादेवी निष्पक्ष व न्यायप्रिय राजमाता होत्या. प्रजेसाठी रोजगार निर्माण करण्याची दूरदृष्टी अहिल्यादेवींकडे होती. त्यांनी रस्ते, पूल व घाट बांधले. अहिल्यादेवींचे प्रजाहिताचे धोरण आज शासन राबवित आहे. याच व्यासपीठावरून जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावर शासन काम करत आहे. चौंडी विकासासाठी जो काही आवश्यक निधी लागणार होता, तो देण्याचे काम शासनाने केले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत गोपीचंद पडळकर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच राज्य सरकारच्या नव्या धर्मांतर बंदी कायद्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे तसेच लव जिहाद विरोधातील कायद्याचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हा कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

सभापती प्रा. शिंदे यांनी प्रस्तावित केले. चौंडीच्या विकासासाठी महायुती शासनाने 681 कोटी दिल्याने आज सारा समाज समाधानात आहे. त्यामुळे नवीन काही मागायचे नाही. शिवाय याच विकास आराखड्या अंतर्गत 500 कोटी राखीव निधी आहे. त्यातून चौंडीला येणारे सर्व रस्ते साडेतीनशे कोटीत केले जाणार आहेत व स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर सीना नदीच्या बेटात होणार्या अहिल्यादेवींच्या पुतळ्यामुळे बुडीत होणार्या बंधार्यांच्या निर्मणासाठी दीडशे कोटी त्यात राखीव आहेत असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने जिल्ह्यातील एक लाख एकल महिलांच्या पुनर्वसन व कौशल्य विकासाचा प्रकल्प तयार केला असून त्याला सरकारने मंजुरी द्यावी तसेच अहिल्यानगर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे छोटे स्मारक व्हावे यासाठी सरकारने पाठबळ द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.