जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना फिर्यादीने येथे लघवी करू नका महीला आहेत असे म्हणाल्याचा राग आल्याने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये साक्षीदाराच्या पायाला गोळी लागली असून त्यास अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घटना घडताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन तीन पथके आरोपीच्या शोधार्थ पाठवले आहे.

याबाबत जामखेड पोलीसात अदित्य बबन पोकळे (वय 20 वर्षे धंदा वॉशिंग सेंटर रा पोकळेवस्ती, जामखेड) याने फिर्याद दिली की, रवीवार दि. १ रोजी रात्री दहा वाजता विंचरणा नदीजवळ घर आहे तेथे पोकळे वस्तीवरील नागरीक व महीला होत्या. यावेळी एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले व ते तेथे लघवी करू लागले त्यांना येथे लघवी करू नका महीला बसल्या आहेत. असे म्हणल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी आदीत्य पोकळे यास शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी तेथे कुणाल बंडु पवार (वय २० रा. जामखेड) आला तीन अज्ञातांनी त्यांच्याजवळील पिस्टलने या दोघांवर गोळीबार केला.

कुणाल पवार याच्या पायाच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. त्यामुळे त्याला जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करून अहील्यानगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

गोळीबार झाल्याची घटना पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक उगले व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. सदर गुन्ह्य़ात वापरलेली कारच्या नंबरवरून पोलीसांनी शोध घेतला असून आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना केली आहे. जामखेड शहरात वाढत्या अवैध धंदे वाढत असल्याने गुन्हेगारी चे प्रमाण देखील वाढले आहे. आनेक वेळा जामखेड मध्ये गोळीबाराच्या घटना देखील वाढल्या आहेत त्यामुळे त्या हे दहशदिचे वातावरण निर्माण झाले आहे याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकान कडुन होत आहे.

आमदार रोहित पवार यांचे ट्विट
गोळीबाराच्या घटनेने जामखेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की,
मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन दहशतीत रहावं लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं, ही विनंती!