राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीज्योत रथयात्रेचे सोमवारी जामखेडमध्ये भव्य स्वागत.
जामखेड (प्रतिनिधी) : स्वराज्याच्या जननी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार, शौर्य व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी स्मृतीज्योत रथयात्रा, जिजाऊ विचारांची ज्योत व जलपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजांच्या वतीने जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा ते पाचाड (किल्ले रायगड) अशी स्मृतीज्योत रथयात्रा काढण्यात येणार असून, या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा व कार्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या रथयात्रेचा शुभारंभ रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता सिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळावरून मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सिंदखेडराजा येथील पाच पवित्र विहिरींच्या जलाचे पूजन करून ते जल पाचाड (रायगड) येथील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी नेण्यात येणार असून, तेथे जलाभिषेक करून जिजाऊंना अभिवादन करण्यात येईल.

सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी ही स्मृतीज्योत रथयात्रा जामखेड शहरात आगमन करणार आहे. यावेळी अखंड मराठा समाज, मराठा सेवा संघ, सर्व पत्रकार बांधव तसेच समस्त जामखेडकरांच्या वतीने खर्डा चौक येथे सकाळी ११ वाजता रथयात्रेचे भव्य व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात येणार आहे.

या स्वागत सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवभक्त, जिजाऊप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी होणार असून, राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या विचारांना सामूहिक अभिवादन करण्यात येणार आहे.

तरी जामखेड शहर व तालुक्यातील सर्व जिजाऊ भक्त, शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने खर्डा चौक येथे उपस्थित राहून स्मृतीज्योत रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


