जन जागरण युवा मंचाचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे थेट आयुक्त तुकाराम मुंडेंच्या दरबारात!

- Advertisement -spot_img

जामखेडसह तालुक्यात दुधातील भेसळीचा विळखा..

जन जागरण युवा मंचाचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे थेट आयुक्त तुकाराम मुंडेंच्या दरबारात!

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर ‘अन्न सुरक्षा कायद्या’तंर्गत कठोर कारवाईची मागणी.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहर व संपूर्ण तालुक्यात सध्या दुध भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रश्नावर ‘जन जागरण युवा मंच’ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांनी थेट आवाज उठवला आहे. त्यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना लेखी निवेदन पाठवून, जामखेड परिसरातील भेसळखोरांवर ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६’ अंतर्गत तातडीने आणि कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डॉ. भास्करराव मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहर व तालुक्यात काही दूध विक्रेते, डेअरी चालक आणि पुरवठादार केवळ अधिक नफा मिळविण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. दूधामध्ये पाणी, स्टार्च यासोबतच अत्यंत घातक असलेले डिटर्जंट, युरिया आणि सिंथेटिक रसायने मिसळली जात असल्याची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत.असे भेसळयुक्त दूध पिण्यामुळे नागरिकांना पोटाचे विकार, उलट्या, जुलाब, अन्न विषबाधा (फूड पॉयझनिंग) तसेच यकृत (Liver) व मूत्रपिंडाचे (Kidney) गंभीर आजार जडत आहेत. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचे अत्यंत घातक दुष्परिणाम होत असून जनआरोग्य धोक्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ (FSSAI) नुसार भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. या कायद्याच्या कलम २६ नुसार ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न पुरविण्याची जबाबदारी अन्न व्यवसाय करणाऱ्यांची आहे. तसेच कलम ५१, ५२ व ५९ अंतर्गत निकृष्ट व आरोग्यास अपायकारक अन्न विकणाऱ्यांना कडक दंड व कारावासाची तरतूद आहे.या कायद्याचा आधार घेत डॉ. मोरे यांनी मागणी केली आहे की, “प्रशासनाने जामखेडमधील संशयास्पद दूध डेअरी व पुरवठादारांवर तातडीने विशेष भरारी पथकांमार्फत छापे टाकावेत. दुधाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासावेत आणि दोषींवर अन्न सुरक्षा कायद्यासह भारतीय न्याय संहिता’ (BNS)मधील लागू तरतुदींनुसार कडक गुन्हे दाखल करावेत.”

केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने जामखेडमध्ये विशेष मोहिमा, शिबिरे आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावेत, जेणेकरून नागरिकांना घरच्या घरी दुधातील भेसळ ओळखण्याच्या प्राथमिक पद्धती (घरगुती चाचण्या) समजतील, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

“सर्वसामान्यांचे आरोग्य ही आमची पहिली प्राथमिकता आहे. जामखेड तालुक्यात दूधासारख्या जीवनावश्यक घटकात होणारी भेसळ आम्ही खपवून घेणार नाही. आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यावर तातडीने कठोर पावले उचलतील आणि भेसळखोरांचे धाबे दणाणतील, अशी आम्हाला खात्री आहे. नागरिकांनीही दूध घेताना सतर्क राहावे.”
डॉ. भास्करराव मोरे पाटील (संस्थापक, जन जागरण युवा मंच)

या निवेदनामुळे जामखेडमधील अवैध आणि भेसळयुक्त दूध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आता अन्न व औषध प्रशासन विभाग यावर काय आणि कधी कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा