रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे जामखेड बाजारपेठेवर मोठा परिणाम; ग्राहकांनी फिरवली पाठ
अजगररुपी राष्ट्रीय महामार्गाच्या विळख्यातुन कधी होणार जामखेडकरांची सुटका! नागरिकांची मागणी..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराची बाजारपेठ राज्यात कापड, सोने, भुसार, भाजीपाला आठवडे बाजार तसेच जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध मानली जाते.त्यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असून शहरात लक्षणीय आर्थिक उलाढाल होत असते.

मात्र, जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. नियोजित वेळेत आणि योग्य पद्धतीने काम पूर्ण न झाल्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून सततची वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे

बाहेरून येणाऱ्या ग्राहकांचा तासन्तास वेळ वाहतुकीत अडकून जात असल्याने त्यांनी जामखेडकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

पार्किंगच्या समस्येमुळे वाद वाढत असून काही ठिकाणी त्याचे रूपांतर मारामारीत होत असल्याचे चित्र आहे. याशिवाय, चोरीच्या घटना, दादागिरी, अवैध धंदे आणि टोळक्यांची दहशत यामुळेही बाजारपेठेचे वातावरण बिघडले आहे.

या सर्व परिस्थितीमुळे पंचक्रोशीतील तसेच शेजारील तालुक्यांतील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून त्याचा थेट परिणाम जामखेडच्या बाजारपेठेवर होत आहे. व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौकट
जामखेडची बाजारपेठ राज्यभर प्रसिद्ध असताना आज ग्राहकांनी पाठ फिरवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.यामागील मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आणि नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमण होय.
रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे नागरिक व ग्राहक त्रस्त झाले आहेत.याचा थेट परिणाम व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत असून आर्थिक नुकसान वाढत आहे.प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण हटवून महामार्गाचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे.अन्यथा जामखेडची ओळख असलेली ही बाजारपेठ धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अवधूत पवार सामाजिक कार्यकर्ते..


