बिरसा मुंडा चा लढा म्हणजे आदिवासी स्वाभिमानाचा इतिहास : प्रकाश काळे

जामखेड प्रतिनिधी
आदिवासी जिल्हा नेते प्रकाश काळे
जामखेड (प्रतिनिधी) – आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने जामखेड शहरात आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी आदिवासी जिल्हा नेते प्रकाश काळे, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नवलाखा, सावता परिषदेचे संतोष मोहोळकर,संजय गळगटे, युवा उद्योजक बबलू देशमुख, आनंद राजगुरू, कृष्णा भालेराव, रतन काळे, तेजस झगडे, गोकुळ उगले, जानू क्षिरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा नेते प्रकाश काळे बोलताना म्हणाले की,बिरसा मुंडा चा लढा म्हणजे आदिवासी स्वाभिमानाचा इतिहास आहे. बिरसा मुंडा हे १९व्या शतकातील थोर क्रांतिकारक होते. त्यांनी इंग्रजांविरोधात ‘उलगुलान’चा नारा देत आदिवासींना संघटित केलं. १८८४ साली छोटा नागपूर परिसरात आलेल्या दुष्काळात त्यांनी करमाफीसाठी आंदोलन करत आदिवासींचे नेतृत्व केलं. लोकांनी त्यांना ‘धरती आबा’ म्हणजेच भगवान अशी उपाधी दिली.

बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करत आदिवासींमध्ये आत्मसन्मान निर्माण केला. १८९८ मध्ये छोटा नागपूर भागात ‘जंगल राज’ स्थापन केला. ९ जानेवारी १९०० रोजी इंग्रजांनी डोंबारी बुरुज पर्वतावर भयंकर गोळीबार केला. त्यावेळी बिरसा मुंडा व त्यांच्या साथीदारांनी तीर-कमानाने प्रतिकार केला. या लढ्यात २०० हून अधिक आदिवासी शहीद झाले. यालाच ‘डोंबारी बुरुज नरसंहार’ असे संबोधले जाते.बिरसा मुंडा यांचे विचार आजही प्रेरणादायी असून त्यांची विचारधारा आत्मसात करण्याची गरज आहे.



