अखेर केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्राला प्रतीक्षा, मशागती खोळंबल्या.
जामखेड प्रतिनिधी
देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये अखेर आगमन झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून आता टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असून लवकरच महाराष्ट्राच्या दिशेने कूच करणार आहे.

मात्र, यंदा जून महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातच दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या प्रारंभी होणाऱ्या अवकाळी पावसानेही यंदा पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ४ जूनपर्यंत तालुक्यात लक्षणीय पाऊस न झाल्याने शेतजमिनी कोरड्याच असून शेतीपूर्व मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.

जामखेड तालुका हा प्रामुख्याने शेतीप्रधान तालुका असून येथे खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. पेरणीपूर्व नांगरणी, वखरणी तसेच इतर मशागतीची कामे पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुरेसा आणि वेळेवर पाऊस झाल्यास शेतकरी वेगाने मशागती पूर्ण करून मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात करू शकतील.
सध्या अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्याची तयारी पूर्ण केली आहे.

मात्र पावसाअभावी प्रत्यक्ष शेतीकामांना सुरुवात करता आलेली नाही. मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला सकारात्मक सुरुवात होईल आणि उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे शेतकरी आणि कृषी क्षेत्राचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा आता मान्सूनच्या पहिल्या सरींवर खिळून राहिल्या आहेत.



