प्रताप पवार यांच्यावर कारवाई न झाल्यास १० डिसेंबरपासून उपोषण – जनशक्ती शेतकरी संघटनेचा इशारा

जामखेड प्रतिनिधी –
जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष व आरटीआय कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील कथित गैरव्यवहाराविरोधात थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यांनी व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत २१ ऑगस्ट २०२५ रोजी केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

कारवाईच्या मागणीसाठी भानवसे यांनी १६ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर पाच दिवस अमरण उपोषण केले होते. त्यावेळी समज मंत्री अतुल सावे तसेच विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांनी लेखी आश्वासन दिले होते; मात्र आजवर कोणतीही ठोस दखल न घेतल्याचा आरोप भानवसे यांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर, ४ डिसेंबर २०२५ रोजी भानवसे यांनी संबंधित मंत्री श्री अतुल सावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव तसेच विभागीय सचिव यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ९ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रताप पवार यांच्यावर कारवाई न झाल्यास भानवसे १० डिसेंबर २०२५ पासून हिवाळी अधिवेशनावेळी नागपूर येथील संविधान चौकामध्ये अमरण उपोषणास बसणार आहेत.




