पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; सोयाबीन, उडीद, मुग पिकांनी टाकल्या माना.
जामखेड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; पाणीटंचाईमुळे शेतकरी चिंतेत..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या अनिश्चिततेचे मोठे संकट ओढवले आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, उडीद, मुग तसेच इतर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवण झालेली पिके करपण्याच्या मार्गावर असून अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी कर्ज काढून, महागडे बियाणे व खते खरेदी करून पेरणी पूर्ण केली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली होती. परंतु त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. सध्या शेतातील पिके पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

हवामान विभागाकडून अधूनमधून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस होत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे उशिरा आणि जोरदार पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊन आर्थिक फटका बसणार आहे.

पावसाअभावी तालुक्यातील नदी, नाले आणि ओढे कोरडे पडले असून अनेक ठिकाणी विहिरींनीही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून ग्रामीण भागात चिंता वाढली आहे.

सध्या आषाढी वारीचा उत्साह राज्यभर सुरू असताना जामखेड तालुक्यातील बळीराजा मात्र पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांकडे आशेने पाहत आहे. “पांडुरंगा, चांगला पाऊस पाड आणि आमची शेती वाचव” अशी साकडे शेतकरी घालत असून सर्वांचे लक्ष आता येणाऱ्या काही दिवसांतील पावसाकडे लागले आहे.
दरम्यान, कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यास काही प्रमाणात परिस्थिती सुधारू शकते. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप हंगामावर मोठे संकट ओढवून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



