विधानसभेत कर्जत-जामखेडचा आवाज घुमला..

- Advertisement -spot_img

मतदारसंघातील विविध प्रश्नांवर रोहित पवार आक्रमक

जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी आज विधिमंडळात पुरवणी मागण्यांवर बोलताना ठाम भूमिका घेत सरकारचे लक्ष वेधले.

यावेळी बोलताना त्यांनी कर्जत व जामखेड शहरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्प, SRPF सेंटरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी, तसेच खर्डा व मिरजगाव पोलीस ठाण्यांच्या नव्या इमारतीसाठी अर्थसाहाय्य देण्याची स्पष्ट मागणी केली.

तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट सहकारी संस्थेमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या ठेवी तात्काळ परत मिळाव्यात, अशी मागणी करत मतदारसंघातील ठेवीदारांचे हित जपण्याची भूमिका त्यांनी मांडली. पोलिस दलातील प्रश्नांवरही त्यांनी स्पष्टपणे सरकारला जाब विचारला. पोलिसांसाठी गृहकर्ज योजना, पदोन्नती, बदली प्रक्रिया आणि पोलीस भरतीच्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

कर्जत-जामखेडमधील युवकांसाठी रोजगारनिर्मितीचा मोठा पर्याय ठरू शकणारा एमआयडीसी प्रकल्प राजकारणात अडकला असून, तो मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

राज्यस्तरीय मुद्द्यांवर भाष्य करताना पवार यांनी उद्योगांना मिळणारी महागडी वीज, तसेच हिंजवडी आयटी पार्कमधील खराब रस्त्यांची दयनीय अवस्था यांकडेही सरकारचे लक्ष वेधले. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असतानाही सोलर कनेक्शन वेळेवर दिले जात नाही, आणि दुसरीकडे वीज कनेक्शनही नाकारले जाते, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नैसर्गिक आपत्तीमध्ये पडलेल्या विजेच्या खांबांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, अशा खांबांना पुन्हा उभे करण्यासाठी सुसंगत व स्पष्ट नियमावली तयार करावी, अशी मागणीही आमदार पवार यांनी सभागृहात केली.

एकूणच कर्जत-जामखेडच्या स्थानिक प्रश्नांपासून ते राज्याच्या व्यापक मुद्द्यांपर्यंत रोहित पवार यांनी ज्या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले, ते मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा