पाहाणी करून ताबडतोब नागरिकांसाठी उचलली पुल दुरुस्तीची जबाबदारी.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील वार्ड क्र. २ व ३ मधील मोरे वस्ती परिसरातील पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळ्यात या पुलावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. पुलाच्या दोन्ही बाजूंना भेगा पडून लोखंडी सळई बाहेर आल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी नागरिकांच्या मागणीवर प्रत्यक्ष जाऊन पुलाची पाहणी केली.या पुलाचे काम प्रशासनाच्या अपेक्षेवर न ठेवता मी स्वतःच्या स्वखर्चातून पूर्ण करून देणार कारण हा प्रश्न थेट नागरिकांच्या जीविताशी संबंधित आहे. असे यावेळी बोलताना आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना म्हणाले.

यावेळी येथील नागरिक पांडुरंग माने,उमेश राळेभात, नितीन राऊत, प्रशांत जगदाळे तसेच शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे आदी नागरिक उपस्थित होते.



