शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू..
पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा; समाज कल्याण विभागाचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी
समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभाग, अहिल्यानगरचे सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यासह ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोफत निवास, भोजनासह विविध सुविधा उपलब्ध
शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, इंटरनेट सुविधा तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. उच्च शिक्षणासाठी ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ही योजना मोठा आधार ठरत असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही कोरगंटीवार यांनी सांगितले.

अर्ज सादर करण्यासाठी समाज कल्याण विभागाने अंतिम मुदत निश्चित केली असून विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी संबंधित समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.



